शिवरायांचे मावळे चमकत आहे

Friday, 21 September 2012

सज्जनगड


                                                              सज्जनगड


किल्ले सज्जनगड, सातारा

किल्ल्याची उंची:- ३३५० फूट
किल्ल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
डोंगररांगः- सातारा
जिल्हा :- सातारा
श्रेणी:- मध्यम

प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी. अनंत कवींनी या पावन भूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे.

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.

इतिहास:-

प्राचीन काळी या डोंगरावर आश्र्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला 'आश्र्वलायनगड' म्हणू लागले. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधीले जायचे. चौथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८-१३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २एप्रिल इ.स.१६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून धेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगङ. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. पुढे ३-११-१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३-१२-१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांनी समाधी घेतली. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला. ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २६-१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोजी काटकर हयाला पत्र लिहले की ''श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती......ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात,तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून केलो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे.उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती दीवाकर गोसावी यांचे ईमाने आम्हास श्रुत होऊन होणे तो होईल.....या उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे... या पत्रा प्रमाणे राहाटी करणे.'' या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नौरससातारा' म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-

गडावर शिरतांना लागणार्‍या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार' असे म्हणतात. हे द्वार आग्रेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसर्‍या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो.
ज्या पायर्‍यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायर्‍या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावी कडे वळावे.
घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरा समोरच ध्वजस्तंभ आहे. नंतर आल्यामार्गाने पुन्हा तळयापाशी यावे व सरळ पुढे चालत जावे.वाटेतच उपहारगृह,श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा लागतात. धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात.तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका आहे. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणारी वाट पकडावी आणि आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचं मंदिर आहे तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर,समर्थांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून झाले की मंदिराच्या पुढच्या द्वारातून बाहेर पडायचे आणि डावीकडे वळावे. प्रथम 'ब्रम्हपिसा' मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे.येथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो.गड फिरण्यास दोन तास पुरतात.

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. साधारण ७८० पायर्‍यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो

गडावरून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश:-
अजिंक्यतारा
सातारा शहराचे दृश्य.
चाफळ चे राममंदिर ई

रामसेज


रामसेज


असा झुंजला रामसेज..!

किल्ले रामसेज ! नाशिकपासून अवघ्या १४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. हिंदवी स्वराज्य गिळण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाने शहबुद्दीखान या नामवंत सरदाराची रामसेज च्या मोहिमेवर रवानगी केली. आणि रामसेज वेढ्यात अडकला. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे मराठ्यांनी उधळून लावले. किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.
किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार ? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले राम्सेज्च्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले.
इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.
संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुरखानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. सात हजार मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.
मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव अचूक ओळखला.
ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगरे - नौबती कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येवू लागले. आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले. बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.
बहादूर खानाचा मोतद्दार हा एक मांत्रिक होता. या मांत्रिकाने "भूतांना वश केल्याशिवाय किल्ला जिंकता येणार नाही." असा सल्ला दिला. या कामात आपण पटाईत असून १०० तोळे वजनाचा एक सोन्याचा साप बनवून दिलात तर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सुरक्षित नेवून सैन्याला सोडू असे म्हणून त्याने खानास पटवले.
ठरलेल्या वेळी हा साप हातात घेवून मोतद्दार पुढे निघाला. अर्ध्या वाटेत आल आणि इतक्यात किल्ल्यावरून गोफणीने फेकलेला गोळा त्याच्या छातीत घुसला अन तो धाडकन कोसळला !
आत मात्र बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. औरंग्याच्या स्वप्नाची त्या होळीत राखरांगोळी होत असताना रामसेजच्या तटावर नगरे आणि चौघडे झडत होते आणि किल्ल्यावर मराठे विजयोत्सव साजरा करत होते !
पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वर झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता ! रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार ! त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासाला माहित नाही ! त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.
पूर्वी मोगलाईत असलेल्या रामसेज पुन्हा जिंकायचा हि औरंगजेबाची महत्त्वकांक्षा धुळीला मिळाली. नामवंत मातब्बर सरदार, प्रचंड मोठी फौज, दारुगोळा आणि खजिना ओतूनही रामसेज सारखा एक सामान्य डोंगरी किल्ला अजूनही जिंकता येत नव्हता. किल्ल्यासाठी पुरवलेल्या दारूगोळ्याची आणि सगळ्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश बादशाहने आपल्या अधिकाऱ्यांना दिले.
कदाचित रामसेज हा मोगलाईच्या अंतापर्यंत असाच राहिला असता. अढळ आणि अजिंक्य ! पण मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान नवीन किल्लेदाराला फितवले ! आणि दुर्दैव.. ! अनेक सरदारांना पाच वर्ष झुंजून जे साध्य झाले नाही ते लाच देऊन लगेच साध्य झाले ! केवळ फितुरीमुळे गड मोगलांना मिळाला !
एका सामान्य मैदानी किल्ल्याने मोगलांना एक न दोन तब्बल पाच वर्ष अहोरात्र झुंजवले ! एका मैदानी किल्ल्याने मोगलाची हि दयनीय अवस्था केली तर मग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेले स्वराज्यतले दुर्गम किल्ले कसे काय जिंकणार या एकाच विचाराने औरंगजेबाची झोप पार उडाली ! कधी संताप तर कधी भीतीने त्याचा उभा देह थरथरू लागला ! अस्वस्थ होवून तो एकसारखा येरझाऱ्या घालू लागला !
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मराठ्याच भगवं वादळ घोंघावत होत ! टीचभर वाटणार हिंदवी स्वराज्य आज गर्वाने छाती फुगवून ताठ मानेन उंच उभ होत आणि अवघ्या हिंदुस्थानचा शेहनशहा होण्याची इच्छा मनी बाळगणारा औरंग्या संताप आणि मनस्तापाच्या खोल गर्तेत आकंठ बुडाला होता !!
राम्सेज्ची झुंझ इतिहासाच्या सोनेरी पानात ज्यांनी सुवर्णाक्षरांनी लिहिली त्या सर्व ज्ञात-अज्ञात योध्याच्या चरणी विनम्र अभिवादन

देवगिरी


                                                                  देवगिरी 


देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन   शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या  ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची  राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द  आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
 देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही  आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत.  अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात

अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि  आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.

रायगड



किल्ल्याची उंची : २९०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः पुणेraigad1
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

महाडच्या उत्तरेस २५ कि. मी. वर हा किल्ला असून याची समुद्रसपाटी पासूनची उंची २८५१ फूट आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी
वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा,
आग्रेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो.
रायगडपासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा
निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे (तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी
महाराजानी निवडली.

इतिहास :रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून
महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’.
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.
१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्विप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर १५.पूर्वेकडील जिब्राल्टर
शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्र्िवन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ. स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्र प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ. स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले.१५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२
फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
१.पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्‍यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

२.खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३.नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो ही पूर्णपणे गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

४.मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५.महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विा व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६.चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.

७.हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८.गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

९.स्तंभ :गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

१०.पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

११.मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

१२.राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४.राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’

१५.नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१६.बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

१७.शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.

१८.जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणेः-श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

१९.महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ. स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

२०.कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

२१.वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.

२२.टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी

२३.हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :
१) मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून : मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाडाही जातात. बसने आल्यावर चित्‌ दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्‍या सुरू होतात तेथे उतरून पायर्‍यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १५०० पायर्‍या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.
२) नाना दरवाजाकडूनही : नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायर्‍यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने आपण गड चढू शकतो.३) रोप-वे : आता गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहचू शकतो.
राहण्याची सोय : रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एम.टी.डी.सी. च्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राह्ण्याची सोय होऊ शकते. रायगड जिल्हा परिषद, तालुका महाड, जिल्हा रायगड अथवा महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र, एक्सप्रेस
टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई – २१ यांच्याशी संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल. पायथ्याच्या पाचाड गावी व गडावर श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन – (९५२१४५) ७४८४८, ७४८६६.जेवणाची सोय : गडावर हॉटेल्स आहेत तेथे जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास