शिवरायांचे मावळे चमकत आहे

Wednesday, 31 October 2012

अर्नाळा


अर्नाळा


अर्नाळा

अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या जलदुर्गावरून नजर ठेवता येत असे.

इतिहास :
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पहाण्याची ठिकाणे :
अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला गज व शरभ प्रतिमा कोरलेली आहे. प्रवेशद्वारावरच एक शिलालेख कोरलेला आहे या शिलालेखामधील,

बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर!

पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!

या ओळींवरुन या किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्यांननी केली हे लक्षात येते.

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर एक सुबक बांधणीचे अष्टकोनी तळ आहे. या शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे.समुद्रकिनार्‍यावरुन किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे.

संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे समोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवट्यावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.

पोहोचण्याच्या वाटा :
पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० किमी वर असून तेथे जायला एस्‌ टी बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्‍यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनार्‍यावरुन समोरच दिसणार्‍या अर्नाळा किल्ल्यावर बोटीने जायला ५ ते १० मिनीटे लागतात.
राहाण्याची सोय :
संपूर्ण गड अर्धा -पाऊण तासात बघून बोटीने किनार्‍यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
विरार पासून १ तास लागतो .

No comments:

Post a Comment